Rayat Shikshan Sanstha Logo

रयत शिक्षण संस्था

"स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद" - कर्मवीर

इतिहास

रयत शिक्षण संस्थेचा इतिहास

महाराष्ट्राच्या शैक्षणिक व सामाजिक इतिहासात रयत शिक्षण संस्थेचे स्थान अनन्यसाधारण आणि प्रेरणादायी आहे. पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी ४ ऑक्टोबर १९१९ रोजी काले येथे संस्थेची स्थापना केली. ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर, कामगार आणि वंचित समाज घटकांतील मुलांना शिक्षणाची संधी मिळावी, हा त्यामागील मुख्य उद्देश होता, “कमवा आणि शिका” (Earn and Learn) ही संकल्पना प्रत्यक्षात आणून शिक्षण सर्वसामान्यांच्या दारी नेण्याचे महान कार्य कर्मवीरांनी केले.

सुरुवातीच्या काळात आर्थिक साधनांची कमतरता, सामाजिक विरोध आणि जातीय अडथळे असूनही कर्मवीर भाऊराव पाटील यांनी जिद्दीने कार्य चालू ठेवले. त्यांनी विद्यार्थ्यांना श्रमाच्या माध्यमातून शिक्षणाची संधी दिली. विद्यार्थी शेतात, वसतिगृहात किंवा इतर कामांमध्ये श्रम करून स्वतःच्या शिक्षणाचा खर्च भागवत असत. या प्रयोगामुळे शिक्षणात स्वावलंबन, श्रमसंस्कार आणि सामाजिक समता यांचा संगम घडून आला.

रयत शिक्षण संस्थेने ग्रामीण समाजजीवनात शिक्षणाचा व्यापक प्रसार केला. प्राथमिक शिक्षणापासून महाविद्यालयांपर्यंत विविध स्तरांवरील शैक्षणिक संस्था उभारून शिक्षणाचा विस्तार केला. विशेषतः मुलींच्या शिक्षणासाठी स्वतंत्र शाळा व वसतिगृहे सुरू करून स्त्रीशिक्षणाला चालना दिली. सामाजिक समतेचा पुरस्कार करताना सर्व जातीधर्मांतील विद्यार्थ्यांना समान संधी देण्याची परंपरा संस्थेने जोपासली.

स्वातंत्र्योत्तर काळात संस्थेने उच्च शिक्षण क्षेत्रातही पाऊल टाकले. कला, वाणिज्य, विज्ञान, अभियांत्रिकी, कृषी कायदा, व्यवस्थापन, शिक्षण अशा विविध शाखांमध्ये महाविद्यालये सुरू करून ग्रामीण युवकांना उच्च शिक्षणाची दारे खुली केली. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, संशोधनाला प्रोत्साहन, तसेच स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रे सुरू करून विद्यार्थ्यांना व्यापक संधी उपलब्ध करून दिल्या आहेत.

"शिक्षण हे समाज परिवर्तनाचे एकमेव साधन आहे हे जाणून पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्था स्थापन करण्याची घोषणा केली."

१९२४ मध्ये संस्थेचे सातारा येथे स्थलांतर करण्यात आले. एक हरिजन विद्यार्थी घेऊन अण्णांनी वसतिगृह सुरू केले. पुढे रयत शिक्षण संस्थेच्या शिक्षण कार्यास त्यांनी वाहून घेतले. स्थानिक लोकांच्या गरजेतून आणि रयत शिक्षण संस्थेच्या सहकार्यातून कर्मवीरांच्या प्रेरणेने शिक्षण प्रसाराचे कार्य संख्यात्मकदृष्ट्या आणि गुणात्मकदृष्ट्या ही गेली १०६ वर्षे सातत्याने वृद्धिंगत होत आले आहे.

१९१९ साली लावलेल्या ज्ञानरोपट्याचे आज एका प्रचंड वटवृक्षात रूपांतर झाले आहे. महाराष्ट्राच्या १५ आणि कर्नाटक राज्यातील ०१ अशा १६ जिल्ह्यांमध्ये पूर्व प्राथमिक शिक्षणापासून विद्यापीठीय शिक्षणापर्यंत प्राथमिक, माध्यमिक, महाविद्यालय, वसतिगृहे, आश्रमशाळा अशा एकूण ७४२ शाखांमध्ये ८,१८,०८९ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तर ११६१७ सेवक शिक्षण प्रसाराचे पवित्र कार्य करीत आहेत. रयत शिक्षण संस्था ही खऱ्या अर्थाने महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यात शिक्षणातून समाज परिवर्तनाचे ऐतिहासिक काम करीत आहे.

Dr. Karmaveer Bhaurao Patil

संस्थापक

पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील

महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात राहणाऱ्या बहुजन समाजाच्या अभ्युदयासाठी एका सेवावृत्ती आणि मानवतावादी दृष्टिकोनातून काम करणारी रयत शिक्षण संस्था भारतातील एक आदर्श आणि अग्रगण्य शिक्षण संस्था आहे. वटवृक्षासारखा विस्तार असणाऱ्या या संस्थेने औपचारिक आणि अनौपचारिक शिक्षणासंदर्भात दिलेले योगदान अनन्यसाधारण असेच आहे.

आधुनिक शिक्षण भगीरथ असा ज्यांचा सार्थ गौरव केला जातो. त्या पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील हे महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, संत गाडगे महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या थोर परंपरेतील एक कृतिशील समाजसुधारक, निर्भिड सत्यशोधक व शिक्षणतज्ञ आहेत.

Read More →
Laxmibai Patil

प्रेरणास्थान

सौ. लक्ष्मीबाई पाटील

रयत माऊली सौ. लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांचा जन्म ७ जून १८९४ रोजी वारणा नदीच्याकाठी कुंभोज जि. कोल्हापूर या ठिकाणी झाला. बालपणापासूनच त्यांना अदाक्का या नावाने ओळखले जात होते. अतिशय चंचल आणि मनमिळाव स्वभावाच्या असलेल्या अदाक्का तशाच त्या धार्मिक वृत्तीच्याही होत्या. १९१२ मध्ये भाऊराव पाटील यांच्याशी त्या विवाहबद्ध झाल्या. विवाहपूर्वी भाऊरावांचे कुटुंब अदाक्का यांना ओळखत होते.


त्यामुळे त्यांना कधीही एकटे वाटले नाही. सासू-सासरे, नणंद, भावजय यांचा सुद्धा त्या नितांत आदर करीत. त्यांच्या उक्ती आणि कृतीतून सतत एक संस्कृती प्रतिबिंबित होत होती. त्या सतत कामात व्यघ्र असत तथापि कधीही कोणत्याही प्रकारची कामाबाबतची तक्रार करत नसत.


Read More →