उपक्रम
सर्व उपक्रम
कमवा व शिका योजना
रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी महाराष्ट्रातील बहुजन समाजाच्या गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध व्हावी म्हणून सन १९१९ मध्ये रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. केवळ आर्थिक परिस्थिती नाही म्हणून कोणत्याही विद्यार्थ्याला त्याच्या शिक्षणाच्या मूलभूत हक्कापासून वंचित राहता कामा नये, यासाठी कर्मवीरांनी 'कमवा आणि शिका' ही योजना कार्यान्वित केली. या योजनेमुळे ग्रामीण भागातील प्रज्ञावंत विद्यार्थ्यांना शिक्षणाचे एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले.






योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये व वाटचाल:
- समताधिष्ठित समाज व्यवस्था: सर्व जाती-धर्माच्या विद्यार्थ्यांसाठी एकाच वसतिगृहाची निर्मिती करून कर्मवीरांनी समतेचा प्रयोग महाराष्ट्राच्या भूमीमध्ये यशस्वी केला.
- श्रमप्रतिष्ठा व स्वावलंबन: सुरुवातीला साताऱ्यातील सोमवार पेठेतील घरात आणि नंतर 'धनीनीची बाग' येथे राहून विद्यार्थी दररोज चार तास शारीरिक श्रमाचे काम करत असत. एकत्र स्वयंपाक करणे व अहोरात्र अभ्यास करून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले.
- उज्ज्वल यश: याच योजनेतून शिक्षण पूर्ण केलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रातील विविध विद्यापीठांचे कुलगुरू म्हणून समर्थपणे काम पाहिले आहे. (उदा. बॅ. पी.जी. पाटील, प्रा. शिवाजीराव भोसले, प्रा. डॉ. एस.एम. पठाण, शंकरराव खरात). तसेच डॉ. एन.डी. पाटील, डॉ. पतंगराव कदम, रामशेठ ठाकूर अशा अनेक मान्यवरांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रात रयतचे नाव उज्वल केले.
- जागतिक मान्यता: कर्मवीरांच्या या योजनेला आज जागतिक मान्यता मिळाली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने कुलगुरू डॉ. नरेंद्र जाधव यांच्या पुढाकाराने सदर योजनेला 'कर्मवीर भाऊराव पाटील कमवा व शिका योजना' असे नाव दिले व ती सर्व महाविद्यालयांत कार्यान्वित केली.
- सद्यस्थिती व सुविधा: आजही रयत शिक्षण संस्थेच्या अनेक महाविद्यालयांमध्ये ही योजना अत्यंत चांगल्या पद्धतीने सुरू आहे. विद्यार्थी काही काळ महाविद्यालयाच्या गरजेनुसार काम करतात आणि त्या मोबदल्यात त्यांना शिक्षण, निवास, भोजन व इतर सर्व प्रकारच्या शैक्षणिक सुविधा दिल्या जातात.

