(राज्य सार्वजनिक विद्यापीठ) स्थापना – २७ ऑक्टोबर २०२१
रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या स्वप्नातील ग्रामीण विद्यापीठ स्थापन करण्याची इच्छा पूर्ण करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण आणि संशोधनाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी रयत शिक्षण संस्थेने कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ सातारा हे ग्रामीण भागातील पहिले समूह विद्यापीठ स्थापन केले आहे. सन २०१८ मध्ये भारत सरकारच्या राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान (RUSA) अंतर्गत देशातील नामांकित उच्च शिक्षण संस्थांना समूह विद्यापीठात (Cluster University) रूपांतरित करण्याची महत्त्वाकांक्षी योजना जाहीर करण्यात आली. या योजनेनुसार ३ ते ५ महाविद्यालयांचे एकत्रीकरण करून एक सक्षम, स्वायत्त आणि गुणवत्तापूर्ण समूह विद्यापीठ स्थापन करण्याचा उद्देश होता.
विद्यापीठाची घटक महाविद्यालये
यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, सातारा
छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा
धनंजयराव गाडगीळ वाणीज्य महाविद्यालय, सातारा
कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ राज्य सार्वजनिक विद्यापीठ असून या विद्यापीठात विद्यापीठ अनुदान आयोग नवी दिल्ली यांचे कडून UGC 2 (f) दर्जा प्राप्त झालेला आहे. भारत सरकारच्या उच्च शिक्षण मंत्रालयाद्वारे या विद्यापीठाचा समावेश सार्वजनिक विद्यापीठांमध्ये केलेला आहे.
• विद्यापीठाचे कुलपती : मा. श्री आचार्य देववृत
• विद्यापीठाचे कुलाधिकारी : मा. श्री चंद्रकांत दळवी
• विद्यापीठाचे कुलगुरू : मा. प्रिं. डॉ. ज्ञानदेव म्हस्के
• विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव : मा. डॉ. विजय कुंभार
या समूह विद्यापीठात मानव्यविद्या, वाणिज्य व व्यवस्थापन, विज्ञान व तंत्रज्ञान तसेच आंतरविद्याशाखीय अभ्यास शाखेअंतर्गत ५० पदवी अभ्यासक्रम, ३४ पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम आणि १९ पीएचडी अभ्यासक्रम सुरू करण्यात आलेले आहेत या विविध अभ्यासक्रमांतर्गत ८७०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

